मुंबई : नागरिकत्व कायदा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या कोटास गुलाबाचे फूल खोचावे व मिरवावे तसे तुम्ही त्यांना मिरवत आहात. त्यामुळेच तुमचे सावरकरप्रेमाचे साफ उघडे पडले आहे. महाराष्ट्रात ढोंग आणि देशात सोंग असा सगळा तुमचा प्रकार आहे. सावरकरांबाबत नक्राश्रु ढाळण्यापेक्षा नागरिकत्व कायद्यावरून देश का पेटला, याचं उत्तर आधी जनतेला द्या, असं आव्हान शिवसेनेनं भाजपला आहे. देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात पेटले आहे. ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. काही ठिकाणी आंदोलनांनी हिंसक वळण घेतले आहे. त्यात भाजपनं वीर सावरकरांच्या अपमानाचा मुद्दाही काढला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे महाराष्ट्रात काय करणार, असा प्रथून राज्यातील विरोधी पक्षाला पडला आहे. हातातन सत्ता गेली. हातातोंडाशी आलेला घास गेला. त्यामुळे त्यांच्या मनावर आलेला ताण आम्ही समजू शकतो. अशा ताणतणावात असले प्रश्न पडतात. अर्थात महाराष्ट्रापुढे यापेक्षाही महत्त्वाचे आणि लोकांच्या जीवनमरणाचे प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असं ही तर मोदी सरकारची हतबलता नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशात भडका उडाला. हे प्रकरण केंद्र सरकारच्या हाताबाहेर गेले आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये आग लागली आहेच, पण बिहार, लखनऊसह इतर राज्यांतही पेटवापेटवी सुरू झाली आहे. राजधानी दिल्लीत तर सगळ्यात जास्त तणावाचे वातावरण दिसत आहे. विधेयकाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या जामिया मिलिया'च्या विद्याथ्यांवर पोलिसांनी बंदुका रोखल्या. गोळ्या चालवल्या. आपल्याच देशातील विद्याथ्यांवर बंदुका रोखण्याची वेळ येते तेव्हा प्रकरण हाताबाहेर गेले असे समजावे. दिल्लीतील पोलिसांची कारवाई अमानुष आणि बेकायदेशीर आहे. जालियनवाला बाग हत्याकांडात इंग्रज यापेक्षा वेगळे वागले नव्हते. १९८४ च्या शीख हत्याकांडावर बोलण्याचा अधिकार आता भाजपास उरला आहे काय? असा सवाल शिवसेनेनं केला. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून देशभरात जो हिंसेचा भडका उडाला, त्याबाबत पंतप्रधानांनी नेहमीप्रमाणे शांततेचे आवाहन केले आहे. या भडक्यामागे पाकिस्तानचे डोके आणि हात असल्याचे जाहीर केले. असे सांगणे ही मोदी सरकारची हतबलता आहे, अशी टीकाही शिवसेनेनं केली. महाशक्तिमान देशात पाकिस्तानसारखा कमजोर देश अशाप्रकारे दंगेधोपे घडवण्याचे सामर्थ्य राखत असेल तर, आपल्या देशाला ते शोभणारे नाही. एका बाजूला सांगायचे, 'सर्जिकल स्ट्राइक' वगैरे करून आम्ही पाकिस्तानला संपवले, गुडघे टेकायला लावले व त्याच वेळी देशात भडका उडाला, त्याचे खापर पाकिस्तानवर फोडायचे, हे पटणारे नाही. पाकिस्तान आपल्या देशात काही गडबड करीत असेल तर त्यांना जन्माची अद्दल घडवणे हाच एकमेव मार्ग दिसतो. एखाद्या आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांच्याशी हस्तांदोलन न करणे विरोधी अशा प्रकाराने काय साध्य होणार? पण अशा विरोधकांच्या बाळबोध आंतरराष्ट्रीय कूटनीतीतच आपण रमलो आहोत व भक्तांना त्याच शौर्यकथा वाटत आहेत, असा टोला शिवसेनेनं भाजपला लगावला आहे. देशात नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून रण पेटले असतानाच भाजपने वीर सावरकर यांच्या अपमानाचा मुद्दाही काढला. वीर सावरकर हे क्रांतिकारकांचे शिरोमणी होतेच. प्रथन इतकाच आहे की, गेली साडेपाच वर्षे केंद्रात भाजपचे सरकार आहे. 'भारतरत्न' देऊन वीर सावरकरांचा सन्मान करण्यासाठी त्यांना कोणी रोखले होते? दुसरे असे की, सावरकरांना 'कलंक' आणि 'माफीवीर' म्हणून हिणवणारी 'आयात' मंडळी महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपच्याच बाकावर बसली आहेत. त्यांचे तुम्ही काय करणार आहात?, असा खडा सवालही त्यांनी केला. फडणवीस सरकारने राज्यात प्रश्नांचे डोंगर उभे केलेत! महाराष्ट्रात आधीच्या सरकारने प्रश्नांचे डोंगर उभे केले आहेत. अरबी समुद्रातील शिवस्मारकातील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाले आहे. अशी अनेक प्रकरणे रटरटत आहेत. त्यावरून लोकांचे लक्ष उडावे म्हणून विरोधी पक्ष फालतू उपद्याप करू पाहत असेल तर हे उद्योग त्यांच्या अंगलट येतील. विरोधी पक्षाने विधायक दृष्टिकोन ठेवावा. विरोधकांच्या कुंडल्या आमच्या हातात आहेत अशा घमक्या देणाऱ्यांपैकी उद्धव ठाकरे नाहीत. अशा धमक्या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. महाराष्ट्रातले हे वातावरण संपले आहे. भीमाकोरेगाव दंगलीत फडणवीस यांचे सरकार कसे हतबल झाले होते याचा अनुभव देशाने घेतला आहे. महाराष्ट्राची नवी कुंडली महाविकास आघाडीचे सरकार मांडत आहे. विरोधकांनी त्यात अडथळे आणू नयेत. आम्हाला महाराष्ट्राच्या ११ कोटी नागरिकांची चिंता आहे. विरोधकांना हे मान्य नसेल व ते रिकामे असतील तर त्यांनी इतर राज्यांत लागलेली आग विझवायला जावे. आम्ही बंब पुस्खू, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.